Friday, December 24, 2010

ऐहिक आणि ऐतिहासिक धनुषकोडी... भाग-२

       रामेश्वरम आणि धनुषकोडी ही दोन्ही अतिप्राचीन गावं अगदी नावासहित रामायणाशी जोडली गेली आहेत. तिथलं ज्योतिर्लिंग, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान कुंड, रामसेतू, विभीषण मंदिर अशा स्थळांना भेट दिल्यावर रामायणाला केवळ कविकल्पना माणनारे लोकसुद्धा एकदा फेरविचार करायला उद्युक्त होतील. श्रद्धाळू लोकांचं तर विचारूच नका! काशीयात्रा रामेश्वरमच्या समुद्रात स्नान केल्यावरच पूर्ण होते असे आपल्याकडे मानले जाते. आता कुठे काशी आणि कुठे रामेश्वरम... तरीही लाखो भाविक श्रद्धेने रामेश्वरमची यात्रा करतात आणि जमल्यास धनुषकोडीही पाहून घेतात.

       'धनुषकोडी' या तमिळ शब्दाचा अर्थ आहे धनुष्याचं टोक! यामागची कथा अशी - रामाने धनुषकोडीहून लंकेकडे जाणारा सेतू बांधायला सुरुवात केली. (समुद्राच्या पाण्यावर तरंगणारे तसे सच्छिद्र खडक (corals) आजही या ठिकाणी पाहायला मिळतात. वास्तविक इथून तलाईमनारपर्यंत जाणारी अंदाजे ३१ किमी लांब प्रवाळ खडकांची रांग (coral reef) आहे. आता यालाच रामसेतू मानायचं की एक 'नैसर्गिक योगायोग' हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे). रावणवध केल्यानंतर राम, सीता आणि रामसेना विभीषणासहित इथे आली. तेव्हा विभीषणाने रामाला तो सेतू तोडून टाकण्याची विनंती केली आणि रामाने धनुष्याच्या टोकाने सेतू तोडून टाकला म्हणून हे 'धनुषकोडी'. इथे विभीषणाचं एक मंदिरसुद्धा आहे.

       धनुषकोडीचा आणखी एक उल्लेख येतो तो स्वामी विवेकानंदसंबंधी. हिंदू धर्माची मूलभूत तत्वे पाश्चिमात्यांना समजावून सांगितल्यानंतर स्वामीजींनी मातृभूमीत पाय ठेवला तो याच धनुषकोडीत! या जागेचं आणखी एक महत्व म्हणजे हे ए.पी.जे अब्दुल कलामांचं जन्मगाव. त्यांचे वडील रामेश्वरम ते धनुषकोडी भाविकांना बोटीतून ने-आण करायचे.

       असं हे धनुषकोडी भूतकाळात एक मोठं व्यापारी, पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. मग अचानक एकाएकी काय झालं की या गावाची सारी रया गेली, भूतकाळातील संपन्नतेच्या खुणा जाऊन त्याजागी विपन्नतेची लक्षणं कशी आली? भरभराटीला आलेलं धनुषकोडी 'Ghost Town' कसं बनलं?

बोट मेल (Boat Mail)

clip_image002

                                                          सौजन्य: http://indianrailways.informe.com/

       १८९८ पासून एगमोर-कोलंबो रेल्वे सुरू करण्यात आली होती. आधी ती तुतीकोरीन पर्यंत येई तिथून तलाईमनार पर्यंत बोटीचा प्रवास (ferry) आणि तलाईमनार ते कोलंबो पुन्हा रेल्वे असा तो प्रवास असे. नंतर पांबनचा पूल बांधण्यात आल्यावर (हा पूलच रामेश्वरमला उर्वरीत भारताशी जोडतो) एगमोर ते धनुषकोडी अशी रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. धनुषकोडीपर्यंत रेल्वे, पुढे तलाईमनारपर्यंत बोटीचा प्रवास आणि परत कोलंबोपर्यंत रेल्वे या प्रवासास आधीपेक्षा खूपच कमी वेळ लागायचा. बोट मेल सारख्याच इतर काही रेल्वेही धनुषकोडीपर्यंत जायच्या त्यातच एक होती पांबन-धनुषकोडी पॅसेंजर…

       चक्रीवादळे या गावांना नवीन नव्हती. परंतू १९ डिसेंबर १९६४ रोजी हिंदी महासागरात दुर्मिळ वातावरणीय स्थितीत निर्माण होणारं आणि त्यामुळेच रौद्रभीषण ठरणारं एक चक्रीवादळ निर्माण झालं. २२ डिसेंबरच्या मध्यरात्री पांबन-धनुषकोडी पॅसेंजर धनुषकोडी स्टेशनात येत असतानाच अशा काही लाटा उसळल्या की त्यांनी ती ट्रेनच नव्हे तर संपूर्ण गावच गिळंकृत केला. ट्रेनमधले सर्व ११५ प्रवाशी मृत्यूमुखी पडले. असे सांगतात की मृतदेह सापडणे दूर, ट्रेनचे अवशेषही बऱ्याच दिवसांनंतर मिळाले. त्या वादळात धनुषकोडी पूर्ण उध्वस्त झालं. एकून १८०० लोक मृत्यूमुखी पडले. यानंतर सरकारने ते गाव परत वसवलं नाही किंबहुना लोकांनाच तिथे रहायची इच्छा उरली नसावी. कारण काहीही असो पण एका रात्रीत उध्वस्त झालेल्या त्या 'Ghost Town' पर्यंत आता एकही ट्रेन धावत नाही…

clip_image004

                                                          सौजन्य: http://www.google.co.in/images

काही लिंक्स:

या वादळाची इत्यंभूत वैज्ञानिक माहिती इथे वाचता येईल

http://journals.ametsoc.org/doi/abs/10.1175/1520-0450%281966%29005%3C0373%3ASSOTRC%3E2.0.CO%3B2

यातल्या लेखिकेचं कुटूंब त्या चक्रीवादळात दुमजली घरामुळे वाचलं होतं.

http://www.withinandwithout.com/2005/12/remembering-1964-dhanushkodi/

'The Hindu’ मधील लेख

http://www.hindu.com/mp/2004/03/06/stories/2004030600010100.htm

सोयीची वाहतूक साधने नसतानाही आता बरेच लोक धनुषकोडीला भेट देतात हे सांगणारा एक लेख

http://www.hindu.com/2010/06/28/stories/2010062858210300.htm

१९६४ च्या वादळात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून एक दगडी स्मारक धनुषकोडी येथे बांधण्यात आलंय. त्यावरील ओळी:

"A cyclone storm with high velocity winds and high tidal waves hit Dhanushkodi town from 22 December 1964 midnight to 25 December 1964 evening causing heavy damages and destroying the entire town of Dhanushkodi"

या घटनेला आज ४६ वर्षे होऊन गेली... त्या चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांना यानिमित्ताने श्रद्धांजली अर्पण करूयात...

No comments:

Post a Comment