Thursday, May 7, 2020

जाणे अज मी अजर

गानसरस्वती स्व. किशोरी आमोणकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेला श्रीमंत केलेले आहेच परंतु त्याचबरोबर संत साहित्याची चैतन्यानुभूतीही त्यांनी श्रोत्यांपर्यंत आणून ठेवली आहे. पं. कुमार गंधर्वांप्रमाणे संतसाहित्याचा सर्वार्थाने अभ्यास करून त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम, संत सोयराबाई, संत मीराबाई यांच्या रचना श्रोत्यांपर्यंत पोहचवल्या. या रचना ऐकणाऱ्या प्रत्येकाला रचनाकाराची परमेश्वराशी एकरूप होण्याची धडपड समजून घेता येते. संत ज्ञानेश्वरांची अशीच एक रचना “जाणे अज मी अजर” किशोरी आमोणकरांनी गायलेली आहे. यात कुठलेही वाद्यसंयोजन नाही. आहे तो केवळ किशोरीताईंचा धीरगंभीर आवाज आणि त्यास तंबोऱ्याची साथ. या द्वयीतून साकारले गेलेले नादविश्व इतके अलौकिक आणि दैवी आहे की ऐकणाऱ्यांना ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागण्याचा दुर्लभ अनुभव क्षणभर का होईना नक्कीच मिळतो.

वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतलेल्या महायोगी संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता प्राकृत मराठीत शब्दश: न आणता त्यातील भावासहित आणली. म्हणूनच ती ‘भावार्थदीपिका’ - ज्ञानेश्वरी.  “जाणे अज मी अजर” या ओवींचे आणखी एक वैशिट्य म्हणजे त्या ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या, अठराव्या अध्यायात आलेल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी या अखेरच्या अध्यायास ‘कळसाध्याय’ म्हटले आहे. तो शेवटचा अध्याय आहे म्हणून कळसाध्याय नव्हे तर मंदिराचा कळस जसा दुरून पथदर्शक ठरतो तसा हा गीताप्रासादाचा कळसाध्याय संपूर्ण गीतादर्शनासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

जी गीतारत्नप्रासादाचा | कळसु अर्थचिंतामणीचा |

सर्व गीतादर्शनाचा | पाढाऊ जो || (ज्ञा. १८-३०)

स्वत:चे शरीर आणि आत्मा यांना पृथक जाणून आत्मा परमात्म्यात विलीन करणे,  परब्रह्माशी एकरूप होणे हे भारतीय तत्त्वज्ञानाचे, एकूणच धर्मशास्त्राचे अंतिम ध्येय आहे. हाच ‘मोक्ष’! कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग या मार्गांवरून चालल्यास मोक्षप्राप्ती होते असे भगवद्गीता सांगते. गीतेच्या अठराव्या अध्यायात (मोक्षसंन्यासयोग) श्रीकृष्ण सांगतात,

 भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ।

ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्‌ || (गीता १८-५५)

याचे सर्वसाधारण भाषांतर असे करता येते की,  आपल्या भक्तीने परमात्म्याला तो जसा आहे तसाच तत्त्वत: जाणणारा त्यात लगेचच प्रविष्ट होतो.

आता परमात्म्याला तत्वत: जाणणे म्हणजे नक्की काय? परमात्म्याला तत्वत: कसे जाणावे? परमात्मा-परब्रह्म दिसतो कसा? त्याचे स्वरूप काय? तो स्त्री अथवा पुरुष आहे काय? तो किती जुना आहे? तो निर्माण कधी आणि कसा झाला? त्याचा स्वभाव काय? तो नक्की करतो काय? अशा अनेकविध क्लिष्ट प्रश्नांच्या उत्तरासाठी परत ज्ञानेश्वरीच मार्गदर्शक ठरते. ज्ञानेश्वरीतल्या अठराव्या अध्यायातील ११९३ ते १२०० या ओवींमध्ये मुख्यत: ‘मी’ या प्रथमपुरुषी सर्वनामाची विशेषणे आली आहेत. ‘मी’ कोण? तर परमात्मा-परब्रह्म. परंतु परमात्म्याला जाणणारा ‘तो’ (साधक) आणि ‘मी’ (परमात्मा) असा भेद न राहता सरतेशेवटी केवळ ‘मी’च राहतो. येथे शेवटची ओवी संपते.

परमात्मा कसा आहे? त्याला जन्मही नाही आणि जरामरणही नाही. त्याला अंत नाही अन आरंभही नाही. तो अपार आहे, अथांग आहे. तो अरूप-निर्गुण-निराकार आहे. तो अनादी-अनंत-चिरंतन आहे. तो अविनाशी आहे. तो अभय-आधार-आश्रय प्रदान करतो. तो सर्वव्यापक आहे. सहज-सर्वत्र भरून राहिलेला आहे तरीही तो असंग आहे . तो कर्मबंधनातून मुक्त आहे, स्वतंत्र आहे. त्यात भर घालता येत नाही आणि त्यात घटही होत नाही. तो नवीनही आहे आणि जुनाही. तो आद्य आहे आणि अर्वाचीनही. तो शून्य आहे तसेच संपूर्णही. तो सूक्ष्म आहे आणि जडही. व्यक्त आहे आणि अव्यक्तही. परमात्मा अशा टोकाच्या विरोधाभासांनी युक्त आहे कारण त्याच्याकडे भेदाभेद नाही. तो ‘अद्वैत’ आहे. अशा परमात्म्याला जाणणे सोपे नक्कीच नाही. त्यास शब्दश: जाणले. परंतु त्यासाठी कुठला मार्ग अनुसरावा? अनन्यभक्ती! अद्वैतास जाणणारी ‘अद्वयभक्ती’. या अद्वयभक्तीने जो परमात्म्यास जाणू पाहतो तो स्वतच: परब्रह्म-परमात्मा होतो – हाच मोक्ष!

किशोरीताईंनी रागरससिद्धांतावर आधारित ‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ सिद्ध केला आहे. मी ‘ग्रंथ सिद्ध केला आहे’ असे का म्हणत आहे ते ‘स्वरार्थरमणीच्या’ वाचकांना नक्कीच समजले असेल. त्या लिहतात की, “शरीराचे अस्तित्व हे अल्पकाळ टिकणारे, मर्यादित स्वरुपाचे असते. परंतु आत्म्याचे अस्तित्व हे अपरिमित, अमर्याद, निराकार, निरंजन, चिरंतन, स्थिर स्वरुपाचे असते. त्याची फक्त जाणीव वा अनुभूती येऊ शकते. त्याचे आपल्याला ज्ञान होत असते, प्रचिती येत असते. अशा तर्‍हेची प्रचिती माध्यमातून येणे हे माध्यमाचे पूर्णस्वरूप, अंतिमस्वरूप असते...माध्यमातून आत्मप्रचिती किंवा आत्मसौंदर्याची प्रचिती येणे हे पर्यायाने स्वतःच्या आत्म्याचेच दर्शन वा बोध असतो”. अद्वयभक्ती करण्यासाठी लागणारे माध्यम व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकते. किशोरी आमोणकरांसाठी हे स्वरमाध्यम आहे. एकदा आत्म्याचा बोध झाला की परमात्म्यात विलीन होण्याची प्रक्रिया सुकर होते. या गानसरस्वतीला हे साध्य झाले यात नवल ते कसले?

 

जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।

अपूर्वु मी अपारु । आनंदु मी ॥ ११९३ ॥

 अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।

आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी ॥ ११९४ ॥

 ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु ।

अभय मी आधारु । आधेय मी ॥ ११९५ ॥

 स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।

सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी ॥ ११९६ ॥

 नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।

स्थूलु मी अणु । जें कांहीं तें मी ॥ ११९७ ॥

 अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।

व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी ॥ ११९८ ॥

 अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।

समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु ॥ ११९९ ॥

 ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।

आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें ॥ १२००॥

                                                                                            - संत ज्ञानेश्वर

Friday, April 29, 2016

परंपरांचे पाईक


 सदरील लेख साप्ताहिक विवेकच्या (२४ एप्रिल) अंकात छापून आला आहे. 

द बॅटल फॉर संस्कृत या पुस्तकाचे मुखपृष्ठ
प्रत्येक संस्कृतीत काही पारंपरिक विचारमूल्ये व त्यांना प्रमाण मानणारा एक मोठा वर्ग आढळून येतो. या विचारमूल्यांवर आक्षेप घेणाऱ्यांना तीव्र सामाजिक विरोधास सामोरे जावे लागते आणि बहुधा अशा आक्षेपांची शहानिशा न करताच ते रद्दबातल ठरवले जातात. भारतीय संस्कृती प्राचीन काळापासून आजतागायत टिकून असल्याने असे आक्षेप आपणांस नवीन नाहीत. परंतु आपल्या संस्कृतीचे वैशिष्टय असे की पारंपरिक मतांच्या संपूर्ण विरोधात जाणाऱ्या विचारसरणींनाही इथे चर्चा, वाद-विवादाद्वारे आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली आणि या विचारसरणी अंगीकारणाऱ्यांनादेखील 'संस्कृतीबाह्य' ठरवले गेले नाही. कुठलाही नवीन सांस्कृतिक व वैचारिक प्रवाह त्यातील वैशिष्टयांसहित, मूळ प्रवाहात सम्मीलित करून घेण्याचे कसब आपल्या संस्कृतीने वेळोवेळी आजमावले. परकीय सैन्यामार्फत केल्या गेलेल्या पध्दतशीर आक्रमणांद्वारे 'लादण्यात' आलेल्या संस्कृती व विचारांवरही हा सर्वसमावेशकतेचा प्रयोग करून पाहण्यात आला. परंतु एकेकाळी अफगाणिस्तानापासून इंडोनेशियापर्यंत पसरलेली सांस्कृतिक मुळे आज केवळ भारतापुरतीच मर्यादित असण्याच्या वस्तुस्थितीवरून या प्रयोगाचे यशापयश पडताळून पाहता येते. हा सांस्कृतिक ऱ्हास नेमका कसा व कधी सुरू झाला, हा गहन चिंतनाचा विषय असून हा ऱ्हास आजही सुरूच आहे ही चिंतेची बाब आहे. यामुळेच भारतीय संस्कृतीतील 'पूर्वपक्ष-उत्तरपक्ष' परंपरेचे कालसुसंगत पुनरुज्जीवन करणे क्रमप्राप्त ठरले आहे. संस्कृतीविषयी आस्था व पारंपरिक मूल्यांवर श्रध्दा असणाऱ्या प्रत्येकाने विरुध्दावलोकन करून सांस्कृतिक, वैचारिक अथवा राजकीय हेतूने प्रेरित विरोधी भूमिका समजून घेऊन (पूर्वपक्ष) त्यास प्रतिवाद करणे (उत्तरपक्ष) आवश्यक आहे.

याच पूर्वपक्ष-उत्तरपक्ष परंपरेला अर्पण केलेले, 'The Battle for Sanskrit' हे राजीव मल्होत्रा यांचे पुस्तक हार्पर कॉलिन्स या विख्यात संस्थेने जानेवारी महिन्यात प्रकाशित केले. काही पाश्चात्त्य विद्यापीठांतून शिकवल्या जाणाऱ्या 'भारतविद्या' (Indology) या विषयांतर्गत संस्कृत भाषेचा व भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना पारंपरिक विचारमूल्यांना जाणीवपूर्वक वगळून मांडण्यात येणाऱ्या, पारंपरिक मतांना छेद देणाऱ्या नवविचारांची, संस्कृतवर व संस्कृतीवर घेण्यात येणाऱ्या आक्षेपांची माहिती येथील संस्कृतीला व परंपरांना प्रमाण मानणाऱ्या सश्रध्द संस्कृत विद्वानांना व अभ्यासकांना करून देणे हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. थोडक्यात, संस्कृत भाषेचा अपारंपरिक दृष्टीकोनातून अभ्यास करणाऱ्या विद्वानमतांचा पूर्वपक्ष करून पारंपरिक विद्वानांना उत्तरपक्ष देण्याचे व त्यायोगे निष्कर्षणात्मक चर्चा घडवून आणण्याचे आवाहन यातून करण्यात आले आहे. संस्कृत आणि संस्कृती एकमेकांपासून विलग करणे अशक्य असल्याचा पुनरुच्चार मल्होत्रांनी वेळोवेळी केला आहे आणि त्यामुळे हे पुस्तक संस्कृतबरोबरच संस्कृतीचीही चर्चा करणारे ठरले आहे.

राजीव मल्होत्रा
आदिशंकराचार्यांनी स्वत: स्थापन केलेल्या शृंगेरी पीठाच्या धर्तीवर अमेरिकेतील कोलंबिया व इतर विद्यापीठांत सुरू करण्यात येणाऱ्या हिंदू धर्म व तत्त्वज्ञानावर आधारित अध्यासनांवर भारतीय संस्कृतीविषयी प्रतिकूल मते मांडणाऱ्या विद्वानांना बसवण्यात येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन मल्होत्रांनी महत्प्रयासाने शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेतली. धर्मपीठांच्या कडक शिस्तीत व परंपरांत न बसणाऱ्या व्यक्तींकडून अशी अध्यासने चालवली जाण्यातला विरोधाभास व त्यातून होऊ शकणारे दूरगामी परिणाम शंकराचार्यांना समजावून सांगतानाच याविषयीचा विस्तृत अहवाल वाचूनच परदेशी विद्यापीठांमधील अशा अध्यासनांस परवानगी देण्याची विनंती शंकराचार्यांना करण्यात आली. आदिशंकराचार्यांपासून सुरू झालेली परंपरा अयोग्य व्यक्तींकडे हस्तांतरित होऊ नये, यासाठी राजीवजींनी केलेले प्रयत्न मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. हे पुस्तक म्हणजे या प्रयत्नांचीच फलश्रुती होय.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासकीय सुलभतेसाठी सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात सर विल्यम जोन्सच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या युरोपप्रणीत पौर्वात्य संस्कृतीच्या अभ्यासाची सूत्रे आता अमेरिकेतून कशी नियंत्रित केली जातात (European Orientalism to American Orientalism) याचे सविस्तर विवेचन या पुस्तकात आले आहे. या दोन्ही विचारधारांतील साम्य व फरक दाखवतानाच अमेरिकन पौर्वात्यवाद संस्कृतमधील पारंपरिक मूल्ये वगळण्याच्या दृष्टीने अधिक धोकादायक असल्याचे मल्होत्रांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकन पौर्वात्यवादाचा आजचा चेहरा असलेले, जगप्रसिध्द संस्कृत विद्वान डॉ. शेल्डन पोलॉक यांच्या पुस्तकांचा व शोधनिबंधांचा गंभीरपणे अभ्यास करून भारतीय पारंपरिक विचारधारेत न बसणारी संस्कृतविषयक त्यांची मते आणि त्यानुसार काढले गेलेले निष्कर्ष वाचकांसमोर ठेवण्यात आले आहेत आणि हाच या पुस्तकाचा गाभा आहे. पोलॉक यांच्या विचारमतांची चिकित्सा करण्यामागे त्यांची विद्वता, जागतिक स्तरावर संस्कृत व भारतीय संस्कृतीसंबंधी त्यांच्या मतांना असणारे वजन, भारतातील डाव्या विचारसरणीच्या अभ्यासकांमध्ये त्यांच्याप्रती असणारा 'अति'आदरभाव अशी काही कारणे आहेत. वर उल्लेख केलेल्या अध्यासनासंबंधित अभ्यास समितीचे अध्यक्षपदही पोलॉक यांच्याकडेच आहे! संस्कृतमधील शास्त्रांचे वर्णन भारतीय संस्कृतीतील 'समस्या' असे करणारा, तसेच सर्व शास्त्रे वेदांवर आधारलेली असल्याने त्यांतून नवीन शिकण्यासारखे काही नाही असे मत मांडणारा पोलॉक यांचा शोधनिबंध १९८५ साली प्रकाशित झाला. तेव्हापासून आजतागायत सुमारे तीस वर्षांत एकाही भारतीय पारंपरिक संस्कृत पंडिताने अथवा अभ्यासकाने पोलॉक यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेऊन त्यांचा प्रतिवाद न केल्याची खंत मल्होत्रा व्यक्त करतात. यामागची कारणमीमांसा करतानाच यापुढे मात्र अशा मतांचे सुसंघटितपणे वैचारिक खंडन करण्याचे आवाहनही ते करतात.

आपल्या विचारांवर युरोपीय किंवा अमेरिकन पौर्वात्यवादाचा शिक्का बसू नये याबद्दल सजग असणारे पोलॉक मुळात सतराव्या शतकातील इटालियन पौर्वात्यवादी विको यांचेच विचार पुढे नेत संस्कृतचा अभ्यास करताना आधिदैविकता व आध्यात्मिकता बाजूला सारून भौतिक बाजूचाच प्रामुख्याने विचार करतात. अशा प्रकारे पारमार्थिकतेला बगल देऊन केवळ व्यावहारिक तत्त्वांचा आधार घेतल्याने पोलॉक आणि भारतीय पारंपरिक विचारमते यांच्यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्याचे मल्होत्रा सुचवतात.

भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असणाऱ्या मौखिक परंपरेतून वेदांतील ज्ञान पिढयानपिढया संक्रमित करण्यात आले, अशी आपली सर्वसाधारण धारणा आहे. परंतु या मौखिक परंपरेला पारमार्थिक ठरवून त्याचेही महत्त्व पोलॉक नाकारतात. केवळ ब्राह्मणांचीच मक्तेदारी असणाऱ्या वेदाध्ययनाव्यतिरिक्त संस्कृतचा इतर कुठलाही उपयोग नव्हता आणि वेदाधारित ज्ञान नवनिर्मिती करण्यास उपयुक्त नसल्याने त्यात सांगितली गेलेली यज्ञादि कर्मकांडे, मंत्रघोष इत्यादींचा वापर ब्राह्मणवर्गाने स्वार्थ साधण्यासाठी केला. यातून संस्कृत ब्राह्मण्यवादाचे महत्त्व पध्दतशीररित्या वाढवण्यात आले आणि इतर वर्गांचे शोषण करणारी सामाजिक उतरंड अस्तित्वात आली, अशा पोलॉकप्रणीत विचारांचा विशेष ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.

वेदांना प्रमाण न मानणाऱ्या बौध्दमताच्या प्रभावामुळेच पूर्वी मौखिक स्वरूपात  बंदिस्त असलेल्या संस्कृत भाषेचा वापर लिखाणासाठी सर्वप्रथम करण्यात आला आणि इथूनच संस्कृतचा खरा इतिहास सुरू होतो, असा पोलॉक यांचा आणखी एक निष्कर्ष आहे. संस्कृतात काव्य (कविता, नाटय, इतर साहित्य) रचण्यास सुरुवात झाल्याने ती केवळ वेदांतील देवस्तुती करणारी भाषा न राहता जनसामान्यांची भाषा बनली आणि त्यामुळेच काव्ये (न ठरता व्यावहारिक ठरत असल्याने) वेदांपेक्षा भिन्न मानावीत, तसेच काव्यांमध्ये आलेली कालानुरूप शोषणमूल्ये काढून टाकावीत असा त्यांचा आग्रह आहे. ही सर्व 'पोलॉकमते' राजीव मल्होत्रांनी संयतरित्या खोडून काढली आहेत.

शेल्डन पोलॉक
या पुस्तकात एक संपूर्ण प्रकरणच पोलॉक यांचा रामायणासंबंधी दृष्टीकोन स्पष्ट करण्यासाठी लिहिले गेले आहे. रामायणाची ऐतिहासिकता नाकारतानाच ते जातक कथांवर आधारित, बुध्दोत्तरकालीन वैदिक ब्राह्मणांनी रचलेले प्रथम संस्कृत काव्य असल्याचे मत पोलॉक यांनी रामायणावरच्या शोधनिबंधात मांडले आहे. ब्राह्मण-राजसत्तेच्या संगनमताने, राम-रावणातील युध्दाचा आधार घेत अकराव्या शतकापासूनच परकीय मुस्लीम आक्रमकांना राक्षसांच्या स्वरूपात दाखवले गेले आणि स्थानिक राजांना देवत्व प्राप्त करवून दिले गेले, असे पोलॉक मानतात. एवढेच नव्हे, तर हिंदू-मुस्लिमांमधील वादाचे मूळ रामायणात शोधण्याचा प्रयत्न करत बाबरी प्रकरणासाठीही ते रामायणासच जबाबदार मानतात. महाभारताचे वर्णनही त्यांनी भाऊबंदकीस उत्तेजन देणारी, यादवी युध्दास कारणीभूत ठरणारी 'जगातील सर्वांत धोकादायक राजकीय गोष्ट' असे केले आहे. हे विचार भारतीय पारंपरिक मतांच्या पूर्णत: विरोधी असल्याने त्यांना वैचारिक प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे.

पोलॉक यांच्या 'The Death of Sanskrit' या प्रसिध्द शोधनिबंधाची मल्होत्रांनी अभ्यासपूर्ण चिकित्सा केली आहे. हिंदू राजांच्या दुर्लक्षामुळे संस्कृत भाषा बाराव्या शतकाच्या आसपासच मृत (नवनिर्मिती करण्यास अक्षम) झाली असून मुस्लीम राज्यकर्त्यांनी आपापल्या परीने तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले, संस्कृतच्या प्रभावाखाली राहावे लागत असल्याने तिच्यात आणि इतर भारतीय भाषांमध्ये तेढ निर्माण झाली, प्रादेशिक भाषांना मिळणाऱ्या उत्तेजनामुळे संस्कृतचा प्रभाव ओसरण्यास मदतच झाली, इत्यादी अनेक मुद्दे त्यातून समोर येतात. या निबंधाच्या सुरुवातीलाच भारतीय जनता पार्टी आणि विश्व हिंदू परिषद यांच्यावर हिंदुत्ववादी राजकारण करून भारताच्या इतिहासाचा विपर्यास केल्याचा आक्षेप पोलॉक घेतात, तसेच स्वातंत्र्यानंतरच्या संस्कृत प्रसारप्रयत्नांची 'राजकीय' अशी संभावना करतात.

अभ्यासकाने राजकीय मते व्यक्त करण्यात काही गैर नाही. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुध्द किमान चार, तसेच आता भारत सरकारच्या कार्यपध्दतीविरुध्द (वेंडीबाई डॉनिगरच्या पुस्तकासंबंधी, जेएनयू वादासहित) वेळोवेळी इंटरनेट अर्जांवर स्वाक्षरी करत आपली भूमिका मांडणाऱ्या पोलॉक यांची राजकीय मते पुरेशी स्पष्ट आहेत. संस्कृत भाषेला आर्यभाषा ठरवतानाच वंशवाद, वर्चस्ववाद व शोषणमूल्यांचे उगमस्थान मानणाऱ्या, जर्मनीतील नाझीवादासाठी संस्कृतला कारणीभूत ठरवणाऱ्या, मौखिक परंपरा व संस्कृत शास्त्रे, मंत्र यांना नाकारणाऱ्या, रामायणास बुध्दोत्तरकालीन वैदिक ब्राह्मणांचे प्रथम काव्य मानणाऱ्या शेल्डन पोलॉक यांना काँग्रेसप्रणीत यू.पी.ए. सरकारने संस्कृत भाषेतील योगदानासाठी २००९ साली राष्ट्रपती सन्मानपत्र व २०१० साली पद्मश्री देऊन त्यांचा 'यथोचित' सन्मान केलेला आहेच.

मूर्ती क्लासिकल लायब्ररीच्या मुख्य संपादकपदी करण्यात आलेली पोलॉक यांची निवडही चर्चेचा विषय बनली आहे. हा विषयही सर्वप्रथम राजीव मल्होत्रांनीच आपल्या व्याख्यानांतून तसेच या पुस्तकातून लोकांसमोर आणला. नारायण मूर्तींचे चिरंजीव रोहन मूर्ती यांच्या संकल्पनेतून व आर्थिक पाठबळातून साकार होणाऱ्या या उपक्रमांतर्गत संस्कृतसहित इतर भारतीय भाषांमधील सुमारे पाचशे प्राचीन ग्रंथांचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले जाणार आहे. या उपक्रमाला विरोध नसला, तरीही भारतीय पारंपरिक मूल्यांवर अविश्वास दाखवून ती नाकारणाऱ्या पोलॉक यांच्या देखरेखीखाली होणारे भाषांतर मूळ ग्रंथांशी सुसंगत असेल की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. या उपक्रमान्वये भाषांतरित झालेल्या पुस्तकांमधील ठळक दोष दाखवून देण्याचे कार्यही संबंधित भाषांमधील काही विद्वान करत आहेत.

या पुस्तकाचा समारोप करताना पोलॉकमतांचे सविस्तर खंडन करण्यासाठी उपयोगी पडू शकणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार केला गेला आहे. पुस्तकाच्या शेवटी दिलेली परिशिष्टे व संदर्भ यादी पाहून मल्होत्रा यांच्या चौफेर अभ्यासाची, तसेच या पुस्तकासाठी त्यांनी घेतलेल्या परिश्रमांची कल्पना येते. संस्कृतसाठीच्या या लढयाचे स्वरूप 'विदेशी विरुध्द स्वदेशी' किंवा 'पोलॉक विरुध्द मल्होत्रा' अशा वैयक्तिक स्वरूपाचे नसून 'अपरंपरागत विद्वानमते विरुध्द परंपरागत विद्वानमते' असा आहे. सध्या सर्वत्र व विशेषत: महाराष्ट्रात 'प्रथा' आणि 'परंपरा' यांतील मूलभूत फरक लक्षात न घेता दोहोंनाही समानार्थी शब्दांनुसार सररास वापरले जात आहे. परंपरांचा अभिमान बाळगण्यास सांगणारी 'प्रतिज्ञा'ही आता पाठयपुस्तकांतून हद्दपार करण्यात आली आहे. असे असतानादेखील आपल्या समृध्द आणि वैविध्यपूर्ण परंपरांचे पाईक होण्यासाठी, संस्कृत(ती)साठी चाललेल्या या लढयात कुठल्या बाजूने उतरावे, याची निश्चित दृष्टी हे पुस्तक देते.

Thursday, March 24, 2016

कुपात्री दान?

दात्याने दान कोणाला द्यावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरीही ते दान सत्पात्री असावे अशी एक अपेक्षा आपल्या संस्कृतीत केली गेली आहे. आता सत्पात्री किंवा कुपात्री याचक कोण हे ठरवणारी कुठलीही अधिकृत संस्था किंवा प्रणाली अस्तित्वात नसल्याने बहुतेकवेळा दात्याच्या बौद्धिक आणि मानसिक कुवतीनुसारच याचकाला सत्पात्री अथवा कुपात्री ठरवल्या जाण्याची शक्यता अधिक असते.

दानाच्या महतीबरोबरच वादांचे महत्त्वही वादे वादे जायते तत्त्वबोध: म्हणून प्रतिपादित केल्या गेले आहे. भारतात अनादिकाळापासून सुरु असणाऱ्या सततच्या वैचारिक मंथनांमुळे ‘वाद’ हा शब्द आपणांस सुपरिचित आहे. परस्परविरोधी तात्विक विचारसरणींमधून निर्माण झालेल्या या वादांमुळे प्रत्येक विचारसरणीतील योग्य-अयोग्य, चांगल्या-वाईट बाबी कालानुरूप समाजासमोर येत गेल्या व त्यातून समाजाची वैचारिक श्रीमंती कमी जास्त होत गेली. पूर्वपक्ष व उत्तरपक्ष यांद्वारे वादांची समीक्षा आणि विवाद करण्याची परंपरा आता लुप्त होत असतानाही नवीन वाद निर्माण होणे थांबले नाहीत किंबहुना यापुढेही थांबणार नाहीत कारण वैचारिक वादविवाद हे सामाजिक जिवंततेचे एक लक्षण आहे.


डावीकडून रोहन मूर्ती व शेल्डन पोलॉक
वैयक्तिक देणगीतून उद्भवलेला असाच एक वैचारिक वाद ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ (Murty Classical Library of India) या उपक्रमाच्या निमित्ताने पुढे आला आहे. पारंपरिक विद्वत्ता विरुद्ध अपारंपरिक विद्वत्ता असे या वादाचे स्वरूप आहे. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातील भारतीय संस्कृतीचे (Indology) अभ्यासक व प्रसिद्ध संस्कृत पंडित डॉ. शेल्डन पोलॉक यांच्या प्रमुख संपादनाखाली भारतातील विविध भाषांमधील सुमारे ५०० प्राचीन ग्रंथांचा इंग्रजीत भाषांतर करण्याचा हा उपक्रम रोहन मूर्ती (नारायण मूर्तींचे चिरंजीव) यांच्या संकल्पनेतून व आर्थिक पाठबळातून साकार होणार आहे. प्रथमदर्शनी या उपक्रमाबद्दल कोणाच्याही मनात शंका उद्भवण्याचे कारण नाही किंबहुना एका पाशात्त्य विद्वानाच्या देखरेखीखाली आपल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला जातोय हे पाहून नेहमीप्रमाणे आपले भारतीय मन सुखावण्याची शक्यताच अधिक!

रोहन मूर्ती यांनी त्यांच्याजवळील संपत्तीचा व्यय कसा करावा हा सर्वस्वी त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात इतरांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही. परंतु प्राचीन भारतीय ग्रंथ हे आपणा सर्वांचे वैभव आहे, आपल्या संस्कृतीचे ते अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषांतराची प्रक्रिया ही केवळ मूर्ती परिवार आणि काही पाशात्त्य विद्वान यांच्यापुरतीच मर्यादित राहून केवळ काही विशिष्ट हेतूने प्रेरित, विशिष्ट लोकांना अभिप्रेत असे या ग्रंथांचे भाषांतर केल्या जाऊ नये तर त्यात भारतीय पारंपरिक विचारांनाही स्थान देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि त्यातूनच वरील वाद उद्भवला आहे. वरकरणी अत्यंत स्तुत्य भासणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत न होण्यामागचे मुख्य कारण आहे, डॉ. शेल्डन पोलॉक यांची संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीबद्दलची मते आणि त्यायोगे त्यांनी काढलेले  काही निष्कर्ष -

१)   हिंदू राजे आणि प्रांतीय भाषांमुळे संस्कृत बाराव्या शतकाच्या आसपासच मृत झाली असून मुस्लीम राजांनी तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले
२)   भारतीय उपखंडात संस्कृतचा प्रसार ब्राह्मण-राजसत्ता यांच्या एकत्र येण्यामुळे झाला
३)   संस्कृतच्या प्रभावाखाली राहावे लागत असल्याने संस्कृत आणि इतर भारतीय भाषांमध्ये तेढ निर्माण झाली
४)   संस्कृतात ‘उपजतच’ असलेल्या वंशवाद, वर्चस्ववाद आणि शोषणमूल्यांनी प्रेरित होऊन जर्मनीत नाझीवादाचा उगम झाला
५)   संस्कृतातल्या मौखिक परंपरेला आणि त्याद्वारे विकसित झालेल्या वेद, शास्त्र इत्यादींना महत्व देण्याचे कारण नाही
६)   वेदांतील कर्मकांड, यज्ञ, मंत्र इ. ब्राह्मण वर्चस्ववादाचे पुरावे आहेत
७)   वेद (परमार्थिक) आणि काव्य (व्यावहारिक) हे परस्परभिन्न असून काव्य लिखित स्वरूपात असल्याने त्यांचा अभ्यास करून त्यातील शोषणमूल्ये काढून टाकली पाहिजेत
८)   संस्कृतात लिखाणाची सुरुवात बौद्ध धर्मास प्रत्युत्तर म्हणून झाली
९)   रामायण ही बुद्धोत्तरकालीन निर्मिती असून त्याचा वापर आजतागायत हिंदूंचे मुस्लिमांवरील आक्रमण वैध ठरवण्यासाठी केला जातो
१०)   राजांना देवत्व प्राप्त करवून देण्यासाठी राजाश्रयाखाली राहणाऱ्या ब्राह्मणांनी ‘सत्तेच्या सौंदर्यीकरणा’द्वारे (aestheticization of power) विविध संस्कृत ग्रंथ रचले इ.

The Battle for Sanskrit या पुस्तकाचे मुखपृष्ठ
भारतीय पारंपरिक विचारसरणीत बसत नसल्याचे सोपे कारण देऊन वरील निष्कर्ष दुर्लक्षून चालणार नाहीत कारण ती अभ्यासाअंती काढलेली आहेत. प्रथम ग्रीक आणि लॅटिन भाषांचा अभ्यास केलेल्या पोलॉक यांनी उर्वरित आयुष्य संस्कृत व भारतीय संस्कृतीच्या अभ्यासासाठी वाहून घेतले आहे. संस्कृत भाषेवरचे त्यांचे प्रभुत्त्व वादातीत आहे आणि त्यामुळेच त्यांच्या विचारांना प्रतिवाद करणेही आवश्यक ठरते. संस्कृतभारतीचे चमू कृष्ण शास्त्री, के.एस.कन्नन यांनी याची सुरुवात केली. J. Hanneder यांचा ‘On “The Death of Sanskrit”’ हा निबंधही या संदर्भात वाचण्यासारखा आहे. राजीव मल्होत्रा यांचे ‘The Battle for Sanskrit’ हे पुस्तक हार्पर कॉलिन्स या प्रकाशन संस्थेने नुकतेच प्रकाशित केले आहे ज्यात त्यांनी पोलॉक यांच्या विचारांचे अभ्यासपूर्ण वैचारिक खंडन केले आहे. या पुस्तकाच्या उपशीर्षकातूनच (Is Sanskrit political or scared? Opressive or liberating? Dead or alive?) उद्धृत विषयाचा परीघ लक्षात येतो. जिज्ञासूंनी हे पुस्तक जरूर वाचावे. हा लेख लिहण्यामागची प्रेरणा सुद्धा हेच पुस्तक आहे.

पोलॉक यांच्या विरोधामागे आणखी एक प्रबळ कारण आहे ते भारताविषयक त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेली खंबीर राजकीय मते. काँग्रेसचे सरकार असताना नरेंद्र मोदी विरोधात आणि आता भारत सरकारच्या एकंदरीत कार्यपद्धतीविरुद्ध (जेएनयु प्रकरणासहित) आजवर किमान पाच आणि तत्सम पंधरा ‘इंटरनेट अर्जां’वर (online petitions) स्वाक्षरी करणाऱ्या पोलॉक यांचा काँग्रेसप्रणित युपीए सरकारने २०१० साली ‘पद्मश्री’ देऊन ‘यथोचित’ गौरव केलेला आहेच. अभ्यासकांना राजकीय मते असण्यात काही गैर नाही. परंतु तात्कालिक घटनांचा आपल्या राजकीय विचारांशी सुसंगत असा सोयीचा अर्थ लावून आपले निष्कर्ष कसे बरोबर आहेत हे पटवून देणे अभ्यासकाच्या भूमिकेला साजेसे नाही. रामायणाची ऐतिहासिकता नाकारतानाच त्यात उद्धृत खगोलीय घटनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करणे व राम रावणातील युद्धाचा संदर्भ देत बाबरी प्रकरण, भारतात मुस्लिमांवर होणारे हल्ले, अत्याचार रामायणावरून प्रेरित आहेत असे म्हणणे त्यामुळेच अयोग्य आहे.

प्राचीन भारतीय परंपरेचा आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक असा विचार न करता दैविक आणि आध्यात्मिक अंगांना तसेच शास्त्रांना ‘समस्या’ म्हणून वगळणे, यज्ञ, मंत्र आणि मौखिक परंपरेचे महत्व आणि जमल्यास अस्तित्वच अमान्य करणे  अशा विचारसरणीतून होणारे संस्कृत ग्रंथांचे इंग्रजी भाषांतर कितपत योग्य मानावे हा प्रश्न आहे. वेदांतील सूक्ते, उपनिषदांतील शांतीमंत्रे, पातंजल योगसूत्रे, सौंदर्यलहरी यांचे भाषांतर होणार की नाही ते माहित नाही परंतु मंत्रांचे मूळ उच्चारात असल्यामुळे त्यांच्या भाषांतरातून अर्थवजा माहितीपेक्षा अधिक काही मिळण्याची अपेक्षा नाही.

मूर्ती क्लासिकल लायब्ररीची काही पुस्तके
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेनंतर काही वर्षांतच विशिष्ट ध्येय ठेवून पौर्वात्य अभ्यासाच्या (Oriental studies) च्या नावाखाली युरोपीय दृष्टीकोनातून भारतीय संस्कृतीच्या अभ्यासाची सुरुवात झाली. सर विलियम जोन्स या कायदेपंडित अभ्यासकाने ‘देवभाषे’ऐवजी ‘भाषा’ व ‘देवनागरी’ऐवजी ‘नागरी’ असे शब्द प्रचलित करण्यास सुरुवात केली. पुढे मॅक्समुल्लर वगैरे विद्वानांनी आर्य-द्रविडवाद अलगदपणे आणला आणि आर्यांना 'बाहेरून आलेले' ठरवण्यात आले. दुर्दैवाने बऱ्याच भारतीय अभ्यासकांनीही हेच मत प्रतिपादले. लोकमान्य टिळकांच्या The Arctic Home in the Vedas, राहुल सांकृत्यायन यांच्या ‘वोल्गा ते गंगा’ किंवा अलीकडचे डॉ. अमर्त्य सेन यांच्या The Argumentative Indian सारख्या पुस्तकांतून हीच बाब अधोरेखित होते. याचाच परिपाक संस्कृत भाषेला आर्यभाषा म्हणून परदेशी भाषा ठरवण्यात झाला. अर्थात हा वाद आजही जिवंत असून आर्य हे भारतीयच होते अशा आशयाचे नवीन पुरावे, DNA reports आता उपलब्ध आहेत. 

संस्कृत ही भारतीय भाषांची जननी किंवा मोठी बहिण नसून त्यांच्यात प्रचंड तेढ होती. ब्राह्मण- राजसत्तेच्या वरदहस्तामुळेच संस्कृतने इतर भारतीय भाषांवर प्रभुत्व गाजवले व त्यांना विकसित होण्याची पुरेशी संधी दिली नाही असा पोलॉक, त्यांचे विद्यार्थी व यांना मानणाऱ्या गटाचा आक्षेप आहे त्यामुळेच कदाचित मूर्ती क्लासिकल लायब्ररीद्वारे प्रादेशिक भारतीय भाषांतील पुस्तकांना अधिक महत्व देण्यात येत आहे. आतापर्यंत अशी नऊ पुस्तके भाषांतरित झाली आहेत. परंतु भाषांतरकारांचा एकूण दृष्टीकोन लक्षात घेता त्यांना सर्वच भारतीय भाषांत आढळणारे संस्कृतोद्भव शब्द (संस्कृत की तमिळ हा वाद लक्षात घेऊनही) त्यांच्या सुयोग्य अर्थाने इंग्रजीत आणणे जड जाईल असे दिसते. उदाहरणार्थ धर्म = religion, ईश्वर = God, आत्मन = soul, देवमुर्ती = idol, शक्ती = Holy Spirit, यज्ञ = sacrifice, शिव = destroyer, माया = illusion, मिथ्या = spurious, मोक्ष = salvation इ. भाषांतर सध्या प्रचलित असले तरी ते सुयोग्य नाहीत. नुकत्याच एका तेलुगु वाचकाने मूर्ती क्लासिकल लायब्ररीद्वारे तेलुगुतून इंग्रजीत भाषांतरित करण्यात आलेल्या ‘मनुचरित्र’ (The Story of Manu) या पुस्तकातील काही दोष दाखवून दिले आहेत. या वाचकाच्या मते कित्येक वाक्प्रचारांना सोयीने वगळण्यात आले आहे किंवा त्यांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. ब्रह्मदेव = The Supreme God किंवा The God Creator, घोर वनप्रदेश = God forsaken place तसेच इतर काही तेलुगु शब्द चुकीचे भाषांतरित करण्यात आले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. एकंदरीतच हे भाषांतराचे काम ‘भारतीय भाषा’ ते ‘इंग्रजी’ असे शब्दकोश पुढे ठेवून केल्या जाणाऱ्या भाषांतरापेक्षा वेगळे न ठरल्यास त्यात आश्चर्य नाही.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास पोलॉक यांच्या मुख्य संपादनाखाली झालेले हे भाषांतर म्हणजे सत्यनारायणाच्या पोथीवर अजिबात विश्वास नसणाऱ्यांनी स्वत: सत्यनारायण करून गावजेवण घालण्यासारखे आहे. आपल्याकडे रामायणाला इजिप्तमध्ये नेऊन बसवणारे, प्रत्येक ऐतिहासिक ग्रंथ व त्यातील पात्रांना ‘myth’ च्या धुक्यात लपेटणारे, महाभारतातील युद्ध हा शैव-वैष्णव यांतील संग्राम मानणारे तथाकथित विद्वान बरेच आहेत. वेंडीबाई डॉनीगर बद्दल तर बोलायलाच नको! या भाऊगर्दीपेक्षा शेल्डन पोलॉक यांची विद्वत्ता वरची आहे. त्यामुळेच त्यांची स्वत:ची मते व त्यांच्याच संपादनाखाली चालणाऱ्या भाषांतर प्रकल्पातील उणीवा, दोष दाखवून देण्यासाठी तितक्याच वैचारिक प्रगल्भतेची आणि अभ्यासाची गरज आहे. केवळ तोंडाला शाई फासणे, उथळ चर्चा करणे किंवा याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याएवढे हे सोपे नक्कीच नाही.

सध्या change.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून पोलॉक यांना या संपादकपदावरून हटवावे अशी मागणी करणारी एक मोहीम चालवली जात आहे. लोकसत्ता या अग्रगण्य दैनिकाने एका जळजळीत अग्रलेखाद्वारे (हटाववादी हुच्च्पणा) या मोहिमेचे वाभाडे काढले परंतु पोलॉक यांना विरोध का केल्या जात आहे ते मुळातून समजून घेण्याची आवश्यकता दाखवली नाही. ‘पद्मश्री’ पोलॉक यांची मुख्य संपादकपदावरून गच्छंती करणे तत्सम एका इंटरनेट अर्जाद्वारे शक्य नाही हे न कळण्याइतपत ‘१३२ विद्वान’ ज्यांनी ही मोहीम सुरु केली आणि त्यांचे ‘१७४५० नाव गाव नसणारे पाठीराखे’ दुधखुळे नक्कीच नाहीत. या अर्जाचा मुख्य उद्देश डॉ. पोलॉक यांचे संस्कृत व संस्कृतीबद्दलचे निष्कर्ष समाजासमोर आणून त्यावर चर्चा घडवणे हा आहे, जो बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे. याविषयीचे अनेक लेख विविध इंग्रजी दैनिकांतून प्रकाशित होत आहेत परंतु प्रादेशिक भाषांमधील लेखांची नेहमीप्रमाणे वानवा आहे. मुळात मूर्ती क्लासिकल लायब्ररी किंवा त्याद्वारे केल्या जाणाऱ्या भाषांतराला विरोध नसून या उपक्रमाचे मुख्य संपादकपद भूषवणाऱ्या डॉ. शेल्डन पोलॉक यांच्या वैचारिक भूमिकेला आहे. तसेच हा उपक्रम बंद करण्याचा हेतू नसून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आहे. स्वदेशी की विदेशी असेही या वादाचे स्वरूप नाही.

शेवटी मूर्ती क्लासिकल लायब्ररीला हार्दिक शुभेच्छा देऊन एकच अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो की या उपक्रमाद्वारे भाषांतरित होणारे ग्रंथ शेल्डन पोलॉक यांना अभिप्रेत असणाऱ्या अर्थाऐवजी मूळ ग्रंथांशी इमान राखणारे असावेत ज्यायोगे रोहन मूर्तींचे दान कुपात्री ठरणार नाही.

टीप: डॉ. पोलॉक यांनी लिहिलेल्या अभ्यासलेख व पुस्तकांची यादी मोठी आहे. तरी इच्छुकांनी खालील काही संदर्भ नक्कीच बघावेत.
  1. Pollock, Sheldon. 1985. ‘The Theory of Practice and The Practice of Theory in Indian Intellectual History’. Journal of the American Oriental Society, 105 (3): 499.
  2. Pollock, Sheldon. 1993b. ‘Ramayana and Political Imagination in India’. The Journal of Asian Studies, 52 (2) 261.
  3. Pollock, Sheldon. 2001b. ‘The Death of Sanskrit’. Comparative Studies in Society and History, 43 (2): 392.
  4. Pollock, Sheldon. 2006. The Language of The Gods in The World of Men. Berkeley: University of California Press.
  5. Pollock, Sheldon. 2006. ‘Crisis in The Classics’. Journal of Social Research, 78 (1): 21.